(Note:- This blog is written in Marathi, an Indian language. For my international/non-Marathi readers, here’s a link to an English poem based on this very post)
माझं पहिलं प्रेम
हे शब्द मनोमनी उच्चारताच गालावर एक मिश्किलसं हसू पसरतं. पण….. ते हसू काही डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. डोळ्यात दिसते ती फक्त एक हलकीशी झाक, आतोआताच बरसणाऱ्या एका वादळाची.
खरं सांगायला गेलं तर , आमची पहिली भेट कधी झाली ते मला आठवत नाही. तीचं माझ्या आयुष्यातलं महत्व कोणत्याही इतर माणसा एवढंच होतं. किंबहुना तेवढंही नसावं. मग अचानकच एके दिनी तो क्षण आला…..
तो एक साधारण दिवस होता. नेहमी प्रमाणेच सगळ्या गोष्टि घडत होत्या. पण त्या दिवशी असं काही तरी घडलं जे आता पर्यंत माझ्या आयुष्यात कधीच घडलं नव्हतं. मी तिलापाहिलं .
तिच्या कुशीत एक लहानगा गोड मुलगा होता. तिचा चेहरा त्या बाळाला पाहून निखळ आनंदाने खुललेला होता. मी तिला पाहिलं आणि माझ्या मनात फक्त एक विचार आला…..
‘ती किती गोड आहे ना!’…..
“काय?!” मी माझ्या मनाला परत विचारलं.
“नाही…. म्हणजे… ते मुल खुप गोड आहे….”
माझ्या मनाने सारवासारव करायचा पुरेपूर प्रयत्न केला. पण खूप उशीर झाला होता. तो क्षण माझ्या मनात कोरला गेला होता …. बहुदा कायमचाच.
दिवसाचे रूपांतर महिन्यात झाले, आणि महिन्याचे जवळ जवळ वर्षात. तरी मी त्याच्या विषयी काही केलं नाही. नशीब माझी साथ देत होतं व आमची जवळजवळ दररोज भेटगाठ होत राहिली. मी अनेक संध्या वाया घालवल्या. पण काहींचा वापर सुध्धा केला. तिच्या आवडी-निवडी, तिचा स्वभाव या विषयी मला जी काही माहिती मिळयची ती मी गोळा करायचो.
अखेर एक दिवस असा आला कि मी तिला माझ्या मनातलं गुपित सांगायचा दृढ निश्चय करून टाकला.
तो दिवसही एक असाच सामान्य दिवस होता.

‘संध्याकाळची वेळ होती…. सूर्य मावळतीला आला होता….. समुद्राच्या लहरी आमच्या तळव्यांना अलगद भिजवून टाकत होत्या. सूर्यकिरणांनी केशरी झालेल्या त्या वाळूत आम्ही दोघे बसलो होतो. आमचा एक हात दुसऱ्याच्या हातात गुंतला होता…. जणू काही आम्ही एक दुसऱ्याला आपल्या अस्तित्वाची सहानुभूतीच देत होतो. आवाज येत होता तो फक्त लाटांचा आणि दूरवर असणाऱ्या काही पक्ष्यांचा. त्या क्षणाला शब्दांची काही गरजच नव्हती. खरंतर शब्द अपुरेच पडले असते. सूर्याला तो अथांग महासागर गिळंकृत करणार तेवढ्यातच आमची नजर एक दुसऱ्याला मिळाली आणि एक सुंदर हसू दोघांच्या गाली पसरलं…..’
जर हा एक चित्रपट असता तर गोष्टं काही अशीच संपली असती.
पण….. आयुष्य एक चित्रपट नव्हे.
त्या दिवशी ….. काय सांगू हो तुम्हाला…. बरच काही घडलं त्या दिवशी. आम्ही बोललो. खूप विचार-विनिमय केला…. तिने माझ्या मनातले विचार जाणून घेतले आणि मी तिच्या. त्या दिवशीचं आमचं बोलणं हे खरंच आमच्या विचारधारांना, वं आमच्या मूळ स्वभावांना उलगडणारं ठरलं. ते समसमान असूनही फार वेगळे होते…. तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनात तिच्याप्रती जसा आदर वाढत गेला तसेच निराशा ही वाढू लागली. ती एकाच वेळेला माझ्या जवळ पण माझ्या पासून खूप दूर वाटू लागली. जणू मी सूर्याला हात लावण्यासाठी हिमालयाचं शिखर गाठू पाहत होेतो.
अखेर असा निष्कर्ष निघाला की आम्ही दोघांनी मैत्री जोपासणेच बरे. व ह्या विषयाला पूर्णविराम लावावा. जर आयुष्यात गोष्टींना पूर्णविराम लावणं कागदावर लिहिण्या एवढंच सोप्पं असतं तर किती बरं झालं असतं…. तिने माझ्या कडून मागितलेली ती एकमेव गोष्टच माझ्यासाठी अशक्यप्राय होऊन बसली.
आजही आमची भेट होत राहते. आणि कळत नकळत मनात ‘तो’ विचार हळूच डोकावतो. ह्याच आशेने की कधीना कधीतरी एक असा दिवस येईल जेेव्हा ते स्वप्न केवळ स्वप्न बनुन राहणार नाही.

(नक्की काय होतं ते स्वप्न? वाचा समुद्र या लेखामध्ये)
Wonderful.
LikeLiked by 1 person
Thank you! 😊
LikeLike
खुपचं छान👏👏
LikeLiked by 1 person
धन्यवाद! 😁
LikeLike